शेवळा भाजी कशी बनवावी ? | How to make Shevala Bhaji |शेवळा |ड्रैगन स्टॉक याम रेसिपी |Dragon Stalk yam benefits
शेवळा भाजी कशी बनवावी ? | How to make Shevala Bhaji |शेवळा |ड्रैगन स्टॉक याम रेसिपी |Dragon Stalk yam benefits
पहिल्या पडलेल्या पावसात ओली झालेली माती ,त्या ओल्या झालेल्या मातीचा चोहीकडे दरवळणारा सुगंध, आणि हवेत पसरलेली आल्हाददायकता ....या सगळ्यात एक गोष्ट हमखास आठवते- चविष्ट रानभाज्या.ओल्या मातीच्या कुशीतून जणू प्रेमाने वर येणारी भाजी म्हणजे शेवळा . नैसर्गिकरीत्या उगवणारी ही भाजी अगदी निसर्गाचं एक सुंदर देणं आहे . ही एक अशी भाजी जी केवळ डोळ्यांनाच नाही ,तर मनालाही तृप्त करते . शेवळा ही एक कंदवर्गीय भाजी आहे. ही भाजी खाजरी असल्यामुळे स्वच्छ करताना हाताला तेल लावावे म्हणजेच त्रास होत नाही . शेवळा भाजी कशी बनवली जाते (How to make Shevala Bhaji ). तसेच Dragon Stalk yam benefits काय आहेत ते आता आपण बघू . तर भाजी बनवताना सोबत बोंड्याचा पाला किंवा काकड फळे ,कोकम आमसुले ,चिंच यासारख्या आंबट पदार्थायांचा वापर केला जातो .
शेवळा या भाजीला जंगली सुरण ,अरण्य सुरण किंवा रान सुरण अशा विविध नावाने देखील ओळखले जाते . महाराष्ट्रामध्ये ही भाजी कोकण ,अकोला तसेच पश्चिम महाराष्ट्र इत्यादी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते . या भाजीला शास्त्रीय भाषेत ॲमोरपोफॅलस कम्युट्यॅटस (Amorphophallus commutatus )असे म्हणतात . तर इंग्रजीमध्ये एलिफंट फुट याम ( Elephant Foot Yam )आणि ड्रॅगन स्टॉक याम ( Dragon Stalk Yam )असे म्हटले जाते .
1 ) शेवळा रानभाजीचे वर्णन :
या रानभाजीबद्दल सांगायचे झाल्यास या भाजीचे कंद जमिनीत चपटे व गोलाकार असतात . ही भाजी जमिनीपासून वर साधारणपणे 8 ते 10 इंच वाढलेली दिसते . काही ठिकाणी मात्र याच भाजीची प्रचंड आकारात वाढ झालेली पाहायला मिळते .या भाजीचा देठ काही ठिकाणी प्रचंड उंच , म्हणजेच साधारणत: पाच ते सहा फुटांपर्यंत वाढलेला पाहायला मिळतो . मात्र या भाजीला काही भागांमध्ये 'काहकाऱ्या ' असे म्हटले जाते . याचा पापुद्रा हा रंगाने हिरवट व थोड्या पिवळ्या रंगाचा असतो . या भाजीचे देठ ताजे असतानाच शिजवून खातात , तर पापुद्रयाचा भाग वाळवून ठेवला जातो आणि नंतर हवे तेव्हा तो भाजीसाठी वापरता येतो .
शेवळा भाजीच्या वरच्या बाजूला एकावर एक असे पापुद्रयांचे थर मांडलेले पाहायला मिळतात . या पापुद्रयांच्या आतमध्ये नाचणी सारख्या सूक्ष्म दाण्यांनी भरलेला भाग असतो . त्याचबरोबर पिवळसर करड्या रंगाचा भाग आणि हिरवट ,काळे ,पांढरे ठिपके असतात . शेवळा ही रानभाजी रानावनात मोठमोठ्या झाडांच्याखाली ,मोठ्या दगडाच्या जवळ ,लहान-मोठ्या झुडपांखाली नैसर्गिकरित्या उगवलेली पाहायला मिळते . ग्रामीण भागातील लोकांसाठी ही रानभाजी आता एक चांगले आर्थिक उत्पन्नाचे साधन बनली आहे . पावसाळ्याच्या सुरुवातीला साधारणपणे जून- जुलैमध्ये ही भाजी बाजारामध्ये सहज उपलब्ध होते .या रानभाजीला शहरांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे .
2 ) शेवळा भाजी कशी बनवावी ?
साहित्य :
1 ) 2 - 3 जुडया शेवळा भाजी
2 ) बोंडक्याचा पाला किंवा काकड फळे
3 ) 1 किंवा 2 कांदे
4 ) 1 चमच हळद
5 ) 1 किंवा 2 चमच तिखट
6 ) 1 चमच धना पावडर
7 ) लसूण
8 ) जिरे
9 ) मोहरी
10 ) तेल
11 ) चवीनुसार मीठ
आवडीनुसार किंवा आवश्यकता वाटल्यास खोवलेले खोबरे तसेच वाल सुद्धा वापरू शकता .
कृती :
शेवळा भाजी खाजरी असल्यामुळे प्रथम हाताला तेल लावून घ्या . भाजी स्वच्छ करताना त्याच्या आतील म्हणजेच भाजीच्या पापुद्रयाच्या आतमध्ये असलेला शेंदरी रंगाचा भाग काढून टाका . शेंदरी भाग वेगळा काढल्यानंतर उरलेली भाजी बारीक कापून घ्या . भाजी कापून झाली की , पुढची पायरी म्हणजे बोंडक्याचा पाला कापून तयार करणे किंवा काकड फळांचा रस काढणे आणि तो भाजीत टाकावा . त्यानंतर गरम पाण्यात भाजी शिजवून घ्या . आवश्यकता वाटल्यास चवीनुसार त्यात आमसुल ,चिंच इत्यादी आंबट पदार्थ टाकले तरी चालतात . नाही टाकले तरी चालतात . त्यानंतर भाजी थोडावेळ,म्हणजेच दहा ते पंधरा मिनिटे शिजवून घ्या . शिजवून घेतलेल्या भाजीत हळद ,तिखट ,मीठ ,धना पावडर इत्यादी पदार्थ टाका . त्यानंतर मिश्रण एकजीव करा . त्यानंतर पातेल्यात तेल गरम करा . तेल गरम झाल्यानंतर त्यात प्रथम जिरे ,मोहरी टाकून फोडणी करा ,मग त्यात लसूण आणि कांदा टाका . हे मिश्रण खरपूस लालसर होईपर्यन्त परतावे . त्यानंतर त्यात एकजीव केलेले भाजीचे मिश्रण टाकावे आणि पळीने हलक्या हाताने परतून घ्यावे . पुन्हा भाजी 10 ते 15 मिनिटे मऊसर होईपर्यंत शिजू द्यावी . सुमारे दहा ते पंधरा मिनिटानंतर भाजी तयार होते .
3 ) शेवळा भाजी खाण्याचे फायदे :
शेवळा भाजी ही मुळात शेतात पिकवली जात नाही ,तर ती रानावनात निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिकरित्या जमिनीतून उगवते . ही भाजी शुद्ध नैसर्गिक पद्धतीने उगवलेली असते , त्यामुळे या भाजीला मानव निर्मित कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत मिळत नाही . त्यामुळे या भाजीला जैवविविधतेतून विविध प्रकारची खनिजे आपोआपच मिळतात जे मानवाच्या शरीरासाठी आरोग्यवर्धक असतात . तसेच या भाजीमध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात . अलीकडच्या काळामध्ये आधुनिक शेतीपद्धतीमुळे पिकांवर प्रचंड प्रमाणात केमिकलचा वापर केला जातो . त्याचा घातक परिणाम मानवाच्या शरीरावर होतो . अशा भाज्यांमध्ये शरीरास पोषक घटक असतात त्यामुळे , अशा निसर्ग निर्मित भाज्या रोगप्रतिकरक शक्ती वाढवतात . आरोग्यवर्धक गुणांसाठी या भाजीच्या कंदाची पाने दूध आणि साखरेसोबत वाजीकरणामध्ये वापरली जातात . तसेच या भाजीच्या सेवनामुळे पोटाचे विकार कमी होण्यास मदत होते .
आज आपण शेवळा ही भाजी कशी बनवावी याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे . माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या ब्लॉगला नक्की भेट द्या .
हे पण वाचा :
Post a Comment