करवंदांची आंबील कशी बनवावी ? | घरगुती सोपी रेसिपी आणि आरोग्यदायी फायदे
करवंदांची आंबील कशी बनवावी ? | घरगुती सोपी रेसिपी आणि आरोग्यदायी फायदे
भारतीय खाद्य संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे . कारण भारतातील प्रत्येक ऋतूत ,प्रत्येक प्रांतात आणि प्रत्येक घराच्या स्वयंपाक घरात असे काही खास पदार्थ बनवले जातात , जे की ते त्या त्या भागाच्या संस्कृतीचा ,तेथील परंपरेचा आणि तेथील जीवनशैलीचा आरसा असतात .
महाराष्ट्रातील अशाच एका ग्रामीण आणि पारंपरिक व विशेष चवदार अशा एका पेयाचा उल्लेख करायचाच झाला ,तर ' करवंदांची आंबील' हे नाव आवर्जून घ्यावं लागतं. करवंद हे कधी खमंग आंबट ,तुरट तर कधी गोडसर अशा चवीने ओळखले जाणारे रानफळ. उन्हाळ्यात डोंगर उतारावर ,रानवाटांवर सहजपणे काटेरी जाळींवर आढळणारे हे फळ फक्त ताजं खाण्यासाठीच नाही ,तर त्याचा ग्रामीण भागात अनेकप्रकारे उपयोग केला जातो . त्यातीलच एक जुना ,पण अलीकडच्या काळात बऱ्याच लोकांना माहीत नसलेला प्रकार म्हणजे पिकलेल्या करवंदांची आंबील .करवंदामध्ये अॅंटी ऑक्सिडंट्स,जीवनसत्वे आणि औषधी गुणधर्म असतात . शरीरात थंडावा निर्माण करणे आणि पचनक्रिया सुरळीत ठेवणे यासाठी आंबील अत्यंत उपयुक्त ठरते . त्यामुळेच आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत ,शरीर संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी या ग्रामीण व पारंपरिक पेयाचे अर्थात पदार्थांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक वाटते .
या ब्लॉग पोस्टमध्ये आपण पिकलेल्या करवंदांची आंबील कशी बनवावी याची सविस्तर पद्धत ,लागणारे साहित्य ,त्यातील पोषणमूल्य तसेच काही उपयुक्त टिप्स यांची माहिती पाहाणार आहोत . ज्यांनी कधी ही आंबील चाखली आहे त्यांच्या आठवणींना उजाळा मिळेल . आणि ज्यांनी चाखली नाही ,त्यांच्यासाठी ही एक नवीन चव अनुभवायची संधी आहे .चला तर मग , पारंपरिकतेची गोड चव असलेली पिकलेल्या करवंदांची आंबील शिकून घेण्याआधी करवंद या रानफळाबद्दल माहिती जाणून घेऊया .
करवंद म्हणजे काय ?
करवंद हे एक रानफळ आहे . या फळाला वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते ,जसे की ,मराठीत करवंद , हिंदीत करोंेदा ,करूम्चा,इंग्रजीत conkerberry ,तामिळमध्ये कलाहा ,आसामीमध्ये कारेंजा ,मल्याळीमध्ये काराक्का तर कन्नडमध्ये करोंदा . या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Carissa carandas तर कुळ Apocynaceae असे आहे ,तर असे आहे . हे फळ काळ्या रंगाचे आकाराने लहान ,गोलसर किंवा अंडाकृती असते . कच्चं असताना ते हिरवट - पांढऱ्या रंगाचं आणि पिकल्यावर गडद जांभळा तर कधी काळसर जांभळा रंग धारण करते . याची चव कच्चं असल्यावर आंबट -तुरट तर पिकल्यावर गोडसर असते .
करवंद फळांचा उपयोग
करवंदाच्या फळांपासून विविध पदार्थ बनवले जातात उदा . चटणी ,सरबत ,लोणचे ,मोरंबा जॅम ,जेली आणि आंबील .काहीजण वरणात टाकतात .
करवंद ही वनस्पती कोठे आढळते ?
करवंद ही काटेरी आणि झुडुपवर्गीय वनस्पती भारतीय उपखंडातील उष्ण व उपोष्णकटिबंधीय भागात आढळते . ही नैसर्गिकरीत्या डोंगराळ भागात ,जंगलात ,रानवाटांवर आणि शेतीच्या कडेने आपोआप उगवते . भारतात ही वनस्पती प्रामुख्याने महाराष्ट्र ,गोवा ,गुजरात ,मध्यप्रदेश ,उत्तरप्रदेश ,बिहार ,राजस्थान ,आंध्रप्रदेश तामिळनाडू आणि केरळ इत्यादी राज्यांमध्ये आढळते . ही वनस्पती भारतापूरती मर्यादित नसून नेपाळ ,श्रीलंका ,बांग्लादेश ,पाकिस्तान तसेच काही आफ्रिकन व आग्नेय आशियाई देशांमध्येसुद्धा आढळते . महाराष्ट्रात ही वनस्पती प्रामुख्याने कोकण ,सह्याद्री पर्वत रांगा आणि विदर्भात आढळते .कोकणात तर ही सहजपणे आढळणारी वनस्पती आहे . ही कुंपण घालण्यासाठी सुद्धा वापरली जाते . भारतातील अनेक भागात पारंपरिक अन्न व औषध म्हणून या वनस्पतीचा वापर होतो .
करवंदांचे आरोग्यदायी फायदे
1) शरीरातील उष्णता कमी करत असल्यामुळे उन्हाळ्यात करवंदांचे सरबत करून प्यावे .
2) पचन सुधारण्यास मदत करते .
3) करवंदांचे सेवन केल्यास अशक्तपणा व त्वचा विकार दूर होतात.
4) अॅंटीऑक्सिडंट्स भरपूर असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते .
5) करवंदांचा रस किंवा चटणी अपचन ,जुलाब ,अजीर्ण यावर उपयोगी आहे .
6) सर्दी ,खोकला ,ताप इत्यादी आजारांवर गुणकारी .
7) करवंद वनस्पतीच्या मुळाचा अर्क त्वचेवरील फोड ,खाज ,खरूज ,सूज ,बुरशीजन्य संसर्गावर गुणकारी .
8) करवंद वनस्पतीची पाने जखमेवर गुणकारी आहेत .
करवंद ही एक औषधी वनस्पती असून पारंपरिक ज्ञानानुसार योग्यप्रमाणात आणि योग्य पद्धतीने उपयोग केल्यास अनेक सामान्य आरोग्य समस्या नैसर्गिक पद्धतीने दूर करता येतात . मात्र कोणतेही औषध वापरण्यापूर्वी तज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे .
आंबील म्हणजे काय ?
आंबील हे एक महाराष्ट्रातील पारंपरिक पेय असून विशेषत: हे कोकणातील ग्रामीण भागात बनवले जाते . आंबील ही वेगवेगळ्या प्रकारांनी बनवली जाते ,जसे की ज्वारीची ,नाचणीची . करवंदांची आंबील ही त्या प्रकारांपैकीच एक आहे . तर ही एक शरीराला पोषण देणारी ,थोडी दाटसर , थंडावा देणारी आणि चविष्ट अशी पारंपरिक पेयपद्धती . अर्थात पदार्थ, जो की चमचने किंवा बोटाने खाता येतो . गावाकडच्या मातीतून आलेली ही रेसिपी , काळाच्या ओघात ग्रामीण भागात आणि शहरांमध्येही विस्मरणात चालली आहे . पण आज स्थानिक ,पारंपरिक आणि आरोग्यदायी अन्नपदार्थांची नव्याने किंमत केली जात असल्यामुळे करवंदांची आंबीलसुद्धा पुन्हा चर्चेत येऊ लागली आहे .
Post a Comment