Pages

Wednesday, 26 February 2025

पाली- सुधागड तालुक्यातील प्राचीन स्थळे| Ancient Places in Pali Sudhagad Talukas

 


पाली- सुधागड तालुक्यातील प्राचीन स्थळे|Ancient Places in Pali- Sudhagad Talukas


 

भारतातील महाराष्ट्र राज्यातील सुधागड तालुका हा रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी एक तालुका आहे. हा तालुका ऐतिहासिक भूमी म्हणून ओळखला जातो. छत्रपती संभाजीराजे व औरंगजेबाचा मुलगा अकबर याची भेट सुद्धा याच तालुक्यात झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी इतिहास प्रेमींना व पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत आली आहे. या तालुक्यात अनेक प्राचीन स्थळे आहेत. त्या स्थळांबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत.


Ancient Places in Pali Sudhagad Talukas


1) सुधागड

सुधागड हा सुधागड तालुक्यातील एक प्राचीन किल्ला आहे. पूर्वी या किल्ल्याला भोरपगड असेही म्हणत . पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेला हा किल्ला सुधागड या नावाने ओळखला जाऊ लागला . या किल्ल्यावर जाण्यासाठी धोंडसे गाव मार्गे आणि पाच्छापूर गाव मार्गे असे दोन मार्ग आहेत. त्यांपैकी पाच्छापूर गाव मार्गे गेलात तर दर्यागाव ठाकुरवाडी या गावापासूनच सुधागड किल्ल्याचा ट्रेक सुरू होतो. साधारणपणे 20 - 25 मिनिटे प्रवास केल्यानंतर एक लोखंडी जिना दिसतो. हा लोखंडी जिना म्हणजे तुम्ही अचूक मार्गाने गड्यावर जात आहात याचे संकेत देतो. पुन्हा एक लोखंडी जिना चढून साधारणपणे तासाभराच्या चढाईनंतर तुम्ही एका उद्ध्वस्त झालेल्या दरवाजाजवळ येऊन पोहोचता. दरवाजा चढून गेल्यानंतर उजव्या हाताला चिलखती बुरुज आणि चोरवाट पहायला मिळते. येथे विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा चढाई करताना डाव्या बाजूला पाण्याचे टाके पाहायला मिळते. हा ट्रेक जर तुम्ही ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात करत असाल तर पिवळ्या रंगाच्या सोनकीच्या फुलांनी नाहून गेलेला गड डोळ्यांचे अगदी पारणे फेडतो. किल्ल्याच्या शिखरावर विस्तीर्ण असा पठार आहे. राजधानीसाठी याही किल्ल्याचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता असे सांगितले जाते. याच गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाच्छापूर गावात छत्रपती संभाजीराजे व अकबर यांची भेट झाली होती.किल्ल्यावर गेल्यावर सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि आजूबाजूची निसर्गरम्य दृश्य पर्यटकांना थक्क करून सोडतात . गड चढून वर गेल्यावर डावीकडे कमळ तळे आणि महादेव मंदिर पाहायला मिळते. थोडे अंतर चालल्यानंतर उजव्या बाजूला पाण्याचे टाके तर समोर गेल्यावर पंत सचिवांचा वाडा पाहायला मिळतो. वाड्यातून बाहेर पडल्यानंतर उजवीकडे श्री शंकराचे मंदिर तर थोडे पुढे जाऊन डावीकडे चोर वाटेकडे जाणारा मार्ग पाहायला मिळतो. सरळ समोरच पायऱ्या चढून गेल्यास भोराई देवीचे मंदिर दिसते. मंदिरामध्ये तुम्हाला पोर्तुगीज शैलीची घंटा आणि बाहेर पडल्यानंतर दीपमाळ आणि समोरच समाध्या पाहायला मिळतात. मंदिराच्या उजवीकडची वाट ही दारू कोठाराचे अवशेष आणि टकमक टोकाकडे जाते. मंदिरापासून एक वाट दिंडी दरवाजाकडे जाते ज्याला महादरवाजा असे म्हटले जाते. हा दरवाजा रायगड किल्ल्यावरील महादरवाजाची हुबेहूब प्रतिकृती आहे. किल्ल्यावर अजून तुम्हाला श्री सिद्धेश्वर मंदिर ,गजलक्ष्मी मंदिर ,हनुमान तलाव, धान्य कोठार, पाण्याचे टाके, घोडे पागा, हत्ती पागा अशा अनेक वास्तू पाहायला मिळतात. सुधागड किल्ला म्हणजे इतिहास प्रेमी, निसर्गप्रेमी आणि साहसी प्रेमींसाठी एक खजिना आहे. हा किल्ला पाली शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे.


Ancient Places in Pali Sudhagad Talukas


2 ) श्री बल्लाळेश्वर मंदिर पाली

श्री बल्लाळेश्वर मंदिर हे गणपतींच्या आठ मंदिरांपैकी एक असून भक्तांचे अत्यंत श्रद्धेचे ठिकाण आहे. 'बल्लाळेश्वर' या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध असलेले हे एकमेव मंदिर आहे.हे मंदिर जागृत आणि स्वयंभू मंदिर म्हणून ओळखले जाते . या मंदिरात जाण्याआधी धुंडीविनायक मंदिरात जाण्याची प्रथा आहे . मंदिरातील मूर्ती ही पूर्वाभिमुख असून ध्यान स्थितीत आहे आणि तिची सोंड डावीकडे वळलेली आहे. विशेष म्हणजे काही महिन्यात सूर्याचे किरण गणपतीच्या मूर्तीवर पडतात. मंदिरामध्ये एक मोठी घंटा असून समोर दोन तलाव पाहायला मिळतात. या मंदिराचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे. मंदिराचे बांधकाम दगडी शैलीचे असून अतिशय रेखीव असे आहे. गणेश चतुर्थी आणि माघी गणेश जयंती या सणांच्या काळात येथे भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. माघी गणेश जयंतीला येथे मोठा उत्सव भरतो. येथे भेट देणाऱ्या भक्तांसाठी प्रासादाची व राहण्याची सोय उपलब्ध आहे. हे ठिकाण मुंबईपासून सुमारे 115 किमी तर पुण्यापासून सुमारे 121 किमी अंतरावर आहे .


Ancient Places in Pali Sudhagad Talukas


3 ) सरसगड

पाली येथील बल्लाळेश्वर मंदिराजवळ असलेला हा ऐतिहासिक डोंगरी किल्ला पावसाळ्यात अतिशय विलोभनीय दिसतो. तुलनेने छोटा पण सुंदर असा किल्ला. हा किल्ला म्हणजे नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक आकर्षण यांचे मनमोहक मिश्रण आहे असे म्हणायला काही हरकत नाही. किल्ल्याच्या माथ्यावर केदारेश्वराचे मंदिर आहे . या किल्ल्यावरून अप्रतिम असे दृश्य पाहावयास मिळते. तसेच येथे पाण्याची अनेक टाकी , किल्ल्याची प्राचीन रचना आणि दगडी पायऱ्या किल्ल्याचा समृद्ध इतिहास दर्शवितात. निसर्ग, इतिहास आणि शांतता शोधणाऱ्या साहस प्रेमींसाठी हा एक परिपूर्ण विकेंड म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही उत्साही ट्रेकर आणि इतिहासप्रेमी असाल तर तुमच्यासाठी हे एक चांगले ठिकाण आहे. जर तुम्हाला सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्य पाहायचे असेल तर किल्ल्याच्या माथ्यावर जाऊन त्याचा अनुभव घेता येतो.माथ्यावरून तीन कावडीचा डोंगर ,सुधागड, तैल बैला, घनगड आणि कोरीगडही दिसतो .


Ancient Places in Pali Sudhagad Talukas


4) खडसांबळे किंवा नेणवली लेणी

सुधागड तालुक्यात असलेली ही लेणी पाहाण्यासाठी तीन मार्गांनी जाता येते . एक म्हणजे नेणवली गावातून जाणारा मार्ग हा सर्वांत सोपा मार्ग आहे .नेणवली गावातून या लेण्यात सहज पोहचता येते म्हणून या लेण्यांना नेणवली लेणी असेही म्हणतात . दूसरा मार्ग म्हणजे खंडसांबळे गावातून जाणारा मार्ग . या वाटेने लेण्यांपर्यन्त पोहचण्यासाठी सुमारे एक तास लागतो आणि तिसरा मार्ग म्हणजे केवणी पठार मार्ग . हा अतिशय अवघड असा मार्ग आहे . पण पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांसाठी हा सोयीचा मार्ग आहे . केवणी पठार येथून लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे दीड तास लागतो . खंडसांबळे किंवा नेणवली हा एक 37 बौद्ध लेण्यांचा समूह असून इ. स . पू . पहिल्या शतकात कोरल्याचे समजते . हा ट्रेक करताना पक्षी ,वारा , कीटक यांचा आनंदही घेता येतो . सभोवताली निरव शांतता असल्यामुळे द्यानासाठी खूप छान अशी ही जागा आहे . या लेण्यांविषयी जास्त माहिती सापडत नाही, परंतु येथील स्तूपाची रचना पाहता अशा पद्धतीचा स्तूप आपल्याला इतर ठिकाणी पाहायला मिळत नाही. शिल्पकलेने समृद्ध असलेला स्तूप हे एक या ठिकाणचे खास वैशिष्ट्ये पाहायला मिळते. या लेण्यांच्या अनेक गुहा गाडल्या गेल्या असल्याने त्यांचे सर्व प्रवेशद्वार नष्ट झालेले आहेत. या लेण्यांचा खडक लालसर, तपकिरी दगडाचा आणि तो फार टिकाऊ नसल्यामुळे या लेण्यांचे गंभीर नुकसान झालेले पाहायला मिळते .ही लेणी पालीपासून सुमारे 35 किमी अंतरावर आहेत .


Ancient Places in Pali Sudhagad Talukas


5 ) गोमाशी लेणी

ही लेणी अतिशय निसर्गरम्य ठिकाणी वसलेली आहेत . आजूबाजूला असलेला जंगल परिसर यांच्यामुळे या लेण्यांची सफर अत्यंत आल्हाददायक होते . गोमाशी गावापासून ही लेणी साधारण 1 किमी अंतरावर आहेत . ही लेणी एकांतात ,जंगलात आणि डोंगराच्या खोबणीत कोरलेली पाहावयास मिळतात . लेण्यांकडे जाण्यासाठी पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत . पायऱ्या चढून वर गेल्यावर गुहेत समोर पद्मासनात ध्यानस्थ अवस्थेत विराजमान असलेल्या गौत्तम बुद्धांचे सुबक -सुरेख कोरीव शिल्प पाहावयास मिळते . या लेण्यांचा प्रथम शोध जे . इ . ॲबॉट यांनी सन 1889 मध्ये लावला . त्यानंतर 1954 मध्ये या लेण्याला संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे . संध्याकाळी येथे डोंगराच्या पलीकडे होणारा सूर्यास्त आणि गुहेवर वर्षाव झालेले सोनेरी सूर्यकिरण , आसमंतात भरून राहणारी शांतता , संथ वाहणारी नदी असे विलोभनीय दृश्य पाहायला मिळते . हे ठिकाण पालीपासून सुमारे 14 किमी अंतरावर आहे .


Ancient Places in Pali Sudhagad Talukas


6 ) सिद्धेश्वर मंदिर

हे एक प्राचीन यादवकालीन स्वयंभू महादेवाचे मंदिर आहे . हे मंदिर यादव वंशाच्या काळातील असल्याचे सांगितले जाते . त्यामुळे या मंदिराला 'यादवकालीन मंदिर' असेही म्हटले जाते . मंदिराचे बांधकाम हे काळा दगड आणि लाकडाचे पाहावयास मिळते . येथे महाशिरात्रीमध्ये मंदिराला सुंदर अशी रोषणाई केली जाते . त्यामुळे वातावरण आनंदमय होऊन जाते . मंदिराच्या समोर एक दीपमाळ असून मागे एक तलाव पाहावयास मिळतो . हे एक शांत असे ठिकाण असून पालीपासून सुमारे 4 किमी अंतरावर आहे .


Ancient Places in Pali Sudhagad Talukas


7) वरदायनी देवी मंदिर -उसर

वरदायनी देवी मंदिर हे सुधागड तालुक्यातील उसर गावातील एक प्राचीन जागृत देवस्थान आहे . येथील ग्राम देवता ही भक्तांच्या हाकेला धावणारी माता म्हणून ओळखली जाते . अखंड वाहाणारा झरा आणि रामकुंड हे येथील खास वैशिष्ट्य आहे. येथे अतिशय नयनरम्य परिसर असून मोठे माळरान पाहायला मिळते. विशेष म्हणजे कास पठार प्रमाणे येथे देखील ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात सुंदर अशी रानफुले फुललेली पाहायला मिळतात . हे मंदिर उसर गावापासून सुमारे 2 किमी अंतरावर अतिशय निसर्गरम्य परिसरात आहे . येथे जाण्यासाठी चारही बाजूने जाता येते . सुधागड तालुक्यातून मढाळी येथून पायवाटेने, तर भावशेत ठाकुरवाडी येथून रस्त्याने या मंदिरापर्यन्त पोहचता येते .अलीकडच्या काळात भावशेत ठाकुरवाडी पर्यन्त एस . टी . बसची सुविधा उपलब्ध आहे .बरेच पर्यटक भावशेत ठाकुरवाडी येथून पायी चालत किंवा स्वत:च्या वाहनाने मंदिरापर्यंत पोहचतात .रोहा तालुक्यातून सुकेळी खिंडीतून वाघ्रणवाडी येथूनही पाय वाटेने या मंदिरात पोहचता येते . या परिसरातील लोक नोकरी निमित्ताने मुंबई ,ठाणे ,पुणे येथे जात असतात . परंतु देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी ते नेहमीच या मंदिरात येत असतात . निसर्गरम्य परिसरात असणाऱ्या या मंदिरात अनेक देवी देवतांच्या मूर्ती पाहावयास मिळतात. चैत्र पौर्णिमेला येथे उत्सव भरतो . देवीच्या दर्शनासाठी नेहमीच सुधागड व रोहा तालुक्यातून असंख्य भक्तगण येत असतात . ट्रेकिंगसाठी हे एक उत्तम असे ठिकाण आहे. येथील धबधबा ' वरदायनी वॉटर फॉल' म्हणून प्रसिद्ध आहे. येथे भेट देण्याचा उत्तम कालावधी म्हणजेच नोव्हेंबर ते फेब्रुवारी असा आहे.


Ancient Places in Pali Sudhagad Talukas


8 ) ठाणाळे लेणी

रायगड -पुणे जिल्ह्याच्या सीमेवर घाटमाथ्याच्या खाली कोरलेली ही लेणी शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. ही लेणी इ. स. पू. पहिल्या शतकातील असल्याचे समजते. ही लेणी 'नाडसूर लेणी' या नावाने देखील ओळखली जातात . ही लेणी पालीपासून वायव्येस सुमारे 25 किमी अंतरावर आहेत. येथे जाताना तीन मार्गाने जाता येते. एक म्हणजे खोपोली -जांभूळपाडा- नवघर मार्गे ठाणाळे. दुसरा मार्ग खोपोली -पेडली -नवघर मार्गे ठाणाळे, तर तिसरा मार्ग पाली-एकवीस गणपती मंदिर- नाडसूर मार्गे ठाणाळे असा आहे . ठाणाळे गावात आल्यानंतर पुढे वाटेने डोंगरात जवळजवळ 4 ते 5 किमी वर घनदाट जंगलात ही लेणी खोदलेली आहेत. येथे एकूण 23 लेण्यांचा समूह असून त्यात चैत्यगृह , स्मारक स्तूप व विहार यांचा समावेश आहे. ब्रिटिशांशी लढताना वासुदेव बळवंत फडके यांनी याच लेण्यांचा आश्रय घेतला होता. या लेण्यांमध्ये बौद्ध स्थापत्य कलेचा प्रभाव दिसून येतो. लेण्यांमधील काही शिल्पे सुबक आहेत तर काही शिल्पे पूर्णावस्थेत नाहीत. ही लेणी पूर्वीच्या व्यापारी मार्गावर असल्यामुळे या लेण्यांना पूर्वी खूपच महत्त्व होते. येथील एका भिंतीवर ब्राम्ही लिपीतील शिलालेख पहावयास मिळतो. तर सभागृहाच्या भिंतीवर विविध प्राणी व मानवी आकृत्या पाहायला मिळतात.सभागृहाच्या छतावर कोरलेले झुंबराचा आभास निर्माण करणारे शिल्प कातळकलेचा सर्वोत्तम आविष्कार म्हणावा लागेल. लेण्यांच्या पठारावरून अप्रतिम असे दृश्य पहावयास मिळते. वर्षभरात या लेण्यांना केव्हाही भेट दिली तरी ती अप्रतिमच वाटतात .


Ancient Places in Pali Sudhagad Talukas


9) गरम पाण्याचे झरे - उन्हेरे

निसर्गाचा चमत्कार समजले जाणारे गरम पाण्याचे झरे- उन्हेरे हे ठिकाण पालीपासून अवघ्या 3 किमी अंतरावर आहे . येथे एकूण तीन कुंडे असून त्यातील एक कुंड थंड पाण्याचे आहे ,तर दोन कुंड गरम पाण्याचे आहेत . यातील थंड पाण्याचे कुंड व गरम पाण्याचे कुंड असे दोन कुंड बाहेरील बाजूस उघड्यावर आहेत . तिसरे कुंड बंदिस्त असून त्यामध्ये महिला व पुरुष असे दोन भाग केले आहेत . येथे पृथ्वीच्या भूगर्भातून येणारे गंधक मिश्रित पाणी हे आरोग्यदायी आहे. सर्व ऋतूंमध्ये आणि सर्वकाळ स्नानासाठी गरम पाणी उपलब्ध असल्यामुळे येथे स्थानिकांची व पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. पर्यटक व सहलीला येणारे विद्यार्थी येथे मनसोक्त आनंद घेताना दिसतात. गरम पाण्याच्या कुंडात स्नान केल्यास त्वचेचे विकार बरे होतात असे म्हटले जाते. त्यामुळे महाराष्ट्रासह देश - विदेशातून अनेक पर्यटक या ठिकाणाला भेट देत असतात . कुंड परिसरात विठ्ठलाचे मंदिर असून कुंडाच्या समोरच्या बाजूला अंबा नदी वाहाते . येथे पूर्वी मोठी यात्रा भरत होती . बाजूला वृक्षराजी आणि शेती असल्यामुळे येथील वातावरण नसर्गरम्य व आल्हाददायक असते . पालीच्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येणारे भक्तगण या ठिकाणाला आवर्जून भेट देतात .


Ancient Places in Pali Sudhagad Talukas


10 ) मृगगड

सुधागड तालुक्यात असलेला हा डोंगरी किल्ला लोणावळा व खोपोली पासून अगदी जवळ आहे. घनदाट जंगलात असलेला हा किल्ला कमी प्रसिद्ध असलेला किल्ला आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी भेलीव नावाचे गाव असल्यामुळे हा किल्ला 'भेलीवचा किल्ला' म्हणून देखील ओळखला जातो. भेलीव गावात जाण्यासाठी सार्वजनिक वाहनांची सोय उपलब्ध नाही ,परंतु गुगल मॅपच्या मदतीने तुम्ही येथे स्वतःच्या वाहनाने पोहचू शकता. या किल्ल्यावर चढण्यासाठी दीड तास आणि उतरण्यासाठी एक तास लागतो. हा एक सोपा आणि छान असा ट्रेक आहे. ट्रेकच्या दरम्यान किंवा किल्ल्यावर कोणत्याही प्रकारचा स्नॅक्स किंवा जेवणाचे पर्याय उपलब्ध नाहीत. किल्ल्याच्या माथ्यावर जुने शिवमंदिर , पाण्याच्या टाक्या व बालेकिल्ल्यात वाड्याचे अवशेष पहायला मिळतात. किल्ल्यावर चढताना डाव्या बाजूला तळाशी गुहा पाहायला मिळते. पावसाळ्यात तुम्हाला या किल्ल्यावरून अप्रतिम असा नजारा पाहायला मिळतो . निसर्गरम्य धबधब्यांनी वेढलेले हे ठिकाणआणि हिरवेगार डोंगर, दऱ्या आणि पाऊस अंगावर झेलत केलेला किल्ल्यावरचा ट्रेक काही औरच असतो. जर तुम्ही उन्हाळ्यात या किल्ल्याला भेट दिली तर नदीकाठी रात्री कॅम्पिंग आणि नदीत पोहण्याचा आनंद घेण्याची मजा काही औरच असते. या किल्ल्यावर पर्यटकांची फारशी गर्दी नसते, परंतु ज्यांना कमी गर्दीची ठिकाणे आवडतात त्यांच्यासाठी हे एक शांत असे ठिकाण आहे. येथून जवळच असलेल्या इतिहास कालीन उंबरखिंड या ठिकाणाला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता.


Ancient Places in Pali Sudhagad Talukas


11 ) श्री विरेश्वर मंदिर-आसरे

पाली - खोपोली मार्गावर असलेल्या पेडली या गावातून श्री विरेश्वर मंदिर-आसरे हे ठिकाण सुमारे 3 किलोमीटर अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे जांभूळपाडा येथून आणि दुसरा मार्ग पेडली गावातून जातो. हे सुद्धा भगवान शिव शंकराचे मंदिर आहे. मंदिराच्या कंपाऊंडमध्ये एक तलाव असून त्या तलावामध्ये एक विहीर पाहायला मिळते. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी शैलीचे असून हे मंदिर सुमारे 200 ते 250 वर्षे जुने असावे. या मंदिरात एक मोठे शिवलिंग असून अनेक देवांच्या मूर्ती आणि चित्रे पाहायला मिळतात.महाशिवरात्रिला येथे यात्रा भरते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भक्तगण इथे दर्शनासाठी हजेरी लावतात. श्रावणी सोमवारी देखील या मंदिरात भक्तगणांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ पाहायला मिळते. आपण जर पाली येथे आलात तर आवर्जून या ठिकाणाला भेट द्या.


Ancient Places in Pali Sudhagad Talukas


12) रामेश्वर मंदिर ( वरचा रामेश्वर )

                   सुधागड तालुक्यातील उंचावर असलेले आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेले नयनरम्य असे हे ठिकाण आहे .  हे ठिकाण 'वरचा रामेश्वर' म्हणून ओळखले जाते. हे अप्रतिम असे मंदिर असून छोटासा ट्रेक करत तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता.ट्रेक करताना एखाद्या ठिकाणी बसून समोरचे नयनरम्य दृश्य अनुभवायला मात्र विसरू नका . हे  मंदिर पाली पासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावर आहे.  हे मंदिर भगवान शिव शंकराचे असून ते इसवी सन 16 65 मध्ये बांधले असल्याचे समजते. जेव्हा श्रीराम सीतेच्या शोधात निघाले होते . तेव्हा जखमी अवस्थेतील जटायूची भेट इथेच झाली होती अशी आख्यायिका सांगितली जाते . तसेच राणी येसुबाई संभाजी महाराजांना घेऊन याच मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या आणि काही काळ मुक्कामही केला होता . या मंदिराकडे जाण्यासाठी उद्धर मार्गे आणि दुधनी- खेमवाडी-घोडगाव रस्त्यावरून रामेश्वर फाटा असे दोन मार्ग आहेत. हे ठिकाण डोंगरावर आणि जंगलात असल्यामुळे खूपच शांतता असते. येथील निसर्गरम्य परिसरामुळे या मंदिराची शोभा आणखीनच खुलून दिसते. या ठिकाणी पोहोचण्यासाठी अलीकडे नवीन रस्ता तयार करण्यात आलेला आहे . हा रस्ता उद्धर गावातून गेलेला असून घाटरस्ता आहे. येथे पोहोचायचे झाल्यास बाईकचा वापर करून पोहोचता येते, परंतु घाट रस्ता असल्यामुळे येथे पोहोचण्यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग स्किल असणे खूपच गरजेचे आहे .  हा परिसर सतत हिरवाईने नटलेला निवांत, एकांत आणि शांत असतो.  मंदिराशेजारीच थंड पाण्याचा झरा आणि कुंड पाहावयास मिळतो. फेब्रुवारी- मार्च महिन्यात झाडावेलींना लागलेल्या फुलांमुळे इथला परिसर अगदी मनमोहक होऊन जातो. उद्धर गावात सुद्धा शिवशंकराचे एक मंदिर आहे येथे महाशिवरात्रीला यात्रा भरते .  तर निसर्गरम्य अशा ठिकाणी असलेल्या या मंदिराला आवर्जून भेट द्या. 


हे सुद्धा वाचा : कोकण किनारपट्टीवरील 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळे


Wednesday, 19 February 2025

कोकण किनारपट्टीवरील 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळे| Top 10 Famous Tourist Spots on Konkan Coast

 


कोकण किनारपट्टीवरील 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळे

                 मित्रांनो  कोकण म्हणजे महाराष्ट्राची शान , कोकण म्हणजे सह्याद्रीची ओळख, कोकण म्हणजे रानमेव्यांचं  घर, कोकण म्हणजे अथांग समुद्रकिनारा..अशा या स्वर्गमय कोकणात पर्यटनासाठी येताना नेमके कोणत्या ठिकाणांना भेट द्यावी असा प्रश्न पर्यटकांना पडल्याशिवाय राहात नाही . कारण येथे सह्याद्री पर्वतांवरुन कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे, अरबी समुद्राला येऊन मिळणाऱ्या नद्या. हिरवीगार वनराई आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेले कोकण नेहमीच पर्यटकांना भुरळ घालत असते. तर आपण कोकण किनारपट्टीवरील पर्यटकांच्या आवडत्या 10 ठिकाणांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Top 10 Famous Tourist Spots on Konkan Coast


1 ) अलिबाग

                         अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे सुट्टीच्या दिवशी मुंबई आणि पुणे येथील पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. येथे तुम्ही खांदेरी,उंदेरी ,कुलाबा या जलदुर्गांना सुद्धा भेटी देऊ शकता.त्याचबरोबर येथून जवळच असलेल्या पोर्तुगीजकालीन रेवदंडा किल्ल्याला सुद्धा भेट देता येते. अलिबागमध्ये तुम्ही चुंबकीय वेधशाळा तसेच सरखेल कान्होजी आंग्रे समाधी या ठिकाणानाही भेट देऊ शकता . येथे वरसोली , कीहीम ,सासवणे , आवास , मांडवा , आक्षी नागाव या प्रसिद्ध बीचवर पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. त्याचबरोबर अलिबाग बीचवरून समुद्रात असलेल्या ऐतिहासिक कुलाबा किल्ल्यावर तुम्ही फेरी मारू शकता . तसेच येथे विविध प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्सचा आणि उंट सवारी ,घोडे सवारीचा आनंद घेता येतो .येथे खवय्यांसाठी अनेक प्रकारचे सिफूड उपलब्ध असतात . कपल आणि फॅमिली टूरसाठी अलिबाग हे कोकणातील उत्तम असे पर्यटन स्थळ आहे . हे ठिकाण मुंबईवरुन सुमारे 98 किमी अंतरावर आहे तर पुण्यावरून 145 किमी अंतरावर आहे .

Top 10 Famous Tourist Spots on Konkan Coast


2 ) दिवेआगर

                                 रायगड जिल्हयात आणि श्रीवर्धन तालुक्यात असलेले दिवेआगर हे स्वच्छ समुद्र किनारा आणि सुवर्ण गणेश मंदिरासाठी ओळखले जाणारे एक विलक्षण पर्यटन स्थळ आहे . या ठिकाणाला भेट द्यायची झाल्यास 3/4 मार्ग आहेत . परंतु तुम्हाला जर समुद्राचा नजारा अनुभवायचा असेल तर मी तुम्हाला दोन मार्ग सुचवेन . एक म्हणजे मुंबईहून मुंबई-गोवा हायवे मार्गे माणगाव मोरबा घाट मार्गे जसवली -श्रीवर्धन- दिवेआगार हा एक मार्ग आहे तर पुण्याहून पौड -मुळशी ताम्हिणी घाटमार्गे माणगाव -मोरबा घाट मार्गे म्हसळा- जसवली- श्रीवर्धन-दिवेआगार असा एक दूसरा मार्ग आहे. मित्रांनो श्रीवर्धनहून दिवेआगर पर्यंतचा प्रवास म्हणजेच नेत्रसुखद मरीन ड्राईव्ह असा आहे. एका बाजूला छोट्या छोट्या टेकड्या ,कौलारू घरांची टुमदार गावं आणि दुसऱ्या बाजूला अथांग पसरलेला अरबी समुद्र. पश्चिमेकडून भरारणा-या वा-याने आपण ताजेतवाने होऊन जातो आणि सागरी किनारी ब्रेक घेण्याचा मोह आवरता येत नाही . या बीचचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हा बीच पाच किलोमीटर लांबीचा असून किनारी केवड्याच्या बनाची झालर आहे. तर मागच्या बाजूला माडांची पार्श्वभूमी लाभलेली आहे. बीचवरील शुभ्र चंदेरी मखमली वाळू, त्यावरची खेकड्यांची रांगोळी आणि त्यात शंख शिंपल्यानी भरलेले विविध रंग पर्यटकांची मने मोहून टाकतात. या बीचवर तुम्ही विविध प्रकारच्या वॉटर स्पोर्टचा आनंद घेऊ शकता. त्याचबरोबर खवय्यांसाठी स्थानिक पदार्थ उपलब्ध असतात. येथे तुम्ही सुवर्ण गणेश मंदिराबरोबरच केदारनाथ भैरव मंदिर ,श्री रूपनारायण मंदिर, श्री सुंदर नारायण मंदिर अशा अनेक मंदिरांना तुम्ही भेट देऊ शकता.

Top 10 Famous Tourist Spots on Konkan Coast


3 ) हरिहरेश्वर

                             मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव येथे बाजारपेठेतल्या उजवीकडच्या वळणापासून हरिहरेश्वर सुमारे 53 किलोमीटर अंतरावर आहे. मोरबा घाटातून म्हसळा मार्गे भोस्ते फाटा येथून हरिहरेश्वर येथे जाता येते. हरिहरेश्वर कडे जाणारा घाट रस्ता आपण कोकणात आल्याची जाणीव करून देतो. प्रवास करताना उजवीकडची श्रीवर्धनची नारळ पोफळीची वाऱ्यावर डुलणारी गर्द हिरवाई आणि दूरवरची सागराची निळाई पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. हरिहरेश्वर मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्यानंतर तेथेच तुम्हाला श्री गणपती व श्री मारुती पाहायला मिळते. या ठिकाणी एक विहीर आहे. त्या विहिरीला 'ब्रह्मकूप' असे म्हणतात. ब्रह्मदेवाने स्वतःच्या हाताने ती खणली अशी भाविकांची श्रद्धा आहे. जवळच तुम्हाला सुमारे 20 फुट उंचीच्या दोन दीपमाळा पाहायला मिळतात. त्यासमोरच श्री हरिहरेश्वराचे मंदिर व त्याच्या शेजारीच श्री कालभैरव मंदिर पाहायला मिळते. सर्वसाधारणपणे प्रथम कालभैरवाचे दर्शन नंतर हरिहरेश्वर दर्शन घेऊन मग गणपती व नंदी सह दीड प्रदक्षिणा घालून परत कालभैरवाचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. दर्शन घेतल्यावर मंदिर परिसरातूनच लहू परिक्रमा व दीर्घ परिक्रमा मार्ग सुरू होतो. परंतु भाविकांनी या परिक्रमा करताना भरतीओहोटीचे गणित साधून सावधानता बाळगावी. येथील समुद्र कायमच उसळता असतो. पर्यटकांच्या फाजील धाडस आणि बेसावधपणामुळे या समुद्रकिनाऱ्यावर अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत. येथे पर्यटकांची फारशी गर्दी नसते. परंतु श्री क्षेत्र हरिहरेश्वर मंदिर हे पुरातन पेशवेकालीन मंदिर आहे. त्यामुळे हे ठिकाण दक्षिण काशी म्हणून सुद्धा ओळखले जाते. येथील समुद्रकिनाऱ्या बरोबरच तुम्ही सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या अगस्ती गुहा या ठिकाणाला सुद्धा भेट देऊ शकता. संध्याकाळी समुद्रात सूर्याचे प्रतिबिंब पडून सोनेरी झालेल्या जलराशी पहात आपण या ठिकाणी हरवून जातो. त्या डुबत्या भास्कराच्या साक्षीने आपलाही सहलीचा दिवस सुखद आठवणींनी संपत असतो.

Top 10 Famous Tourist Spots on Konkan Coast


4 ) दापोली 

                                          दापोली हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण असून ते एक पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. हे ठिकाण दापोली कॅम्प म्हणून सुद्धा ओळखले जाते. तसेच बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे भारतातील सर्वात मोठे कृषी विद्यापीठ याच ठिकाणी आहे. आपण जर कोकणच्या टूरवर असाल तर या विद्यापीठाला आवर्जून भेट द्या. या पर्यटन स्थळाबद्दल बोलायचे झाल्यास येथील टुमदार घरे,मोकळी हवा आणि शहरातून फेरफटका मारताना नजरेस पडणारे विविध रंगी पुष्पसौंदर्य या ठिकाणाचे खास वैशिष्ट्य आहे. हेच सौंदर्य येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे. येथील थंडगार हवेमुळे या शहराला 'मिनी महाबळेश्वर ' म्हणूनही ओळखले जाते. सुंदर समुद्रकिनारे, किनाऱ्यावर हिवाळ्यात घिरट्या घालणारे 'सी- गल' पक्षी , मधुनच दर्शन घडविणारे डॉल्फिन, मासोळी बाजार, ऐतिहासिक गड-किल्ले अशा अनेक गोष्टींसाठी दापोली तालुका प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्ही हरणे बंदर, कड्यावरचा गणपती ,श्री केशवराज मंदिर, मुरुड बीच ,पन्हाळेकाजी लेणी, सुवर्णदुर्ग किल्लाअशा अनेक पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता. हे ठिकाण मुंबईपासून सुमारे 215 किलोमीटर अंतरावर आहे. तर पुण्यापासून हे ठिकाण भोर घाट मार्गे सुमारे 186 किलोमीटर अंतरावर आहे आणि मुळशी पौड मार्गे सुमारे 196 किलोमीटर अंतरावर आहे.

Top 10 Famous Tourist Spots on Konkan Coast



5 ) गणपतीपुळे


                                      सह्याद्रीच्या रांगांमधील हिरवीगार वनराई, नारळ पोफळीच्या हिरवळीने नटलेल्या आणि निसर्गाची अप्रतिम उधळण, स्वच्छ ,सुंदर ,रुपेरी वाळूचा समुद्रकिनारा म्हणजेच गणपतीपुळे. कोकणातील हे ठिकाण श्री गजाननाचे स्वयंभू देवस्थान आणि पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध बनले आहे. मंदिरातील मूर्ती ही पश्चिमाभिमुख असून डोंगराळ भागात विराजलेली आहे. त्यामुळे तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालावी लागते. मंदिराबरोबरच या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा असल्यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. येथील समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही विविध वॉटर स्पोर्ट्स बरोबर उंट सवारी ,घोडे सवारी इत्यादी क्रियाकल्पाच्या आनंद घेऊ शकता. येथे आल्यावर तुम्ही मंदिर आणि बीच बरोबरच प्राचीन कोकण संग्रहालय, नेवरे गावाजवळील सुरुचे बन व बीच, मालगुंड गावातील केशवसुत यांचे स्मारक अशा अनेक पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता . गणपतीपुळे येथून रत्नागिरीच्या दिशेने जाताना आरे- वारे या सनसेट पॉइंटचा नजारा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. 'नवरा माझा नवसाचा' आणि 'फुल थ्री धमाल' या चित्रपटांचे चित्रीकरण गणपतीपुळे येथे झाले होते. त्यामुळे हे ठिकाण अधिकच लोकप्रिय बनले आहे. येथील बीचवर तुम्ही स्थानिक खाद्यपदार्थांबरोबर शहाळीचे पाणी आणि विविध प्रकारच्या सी-पुडचा आस्वाद घेऊ शकता. हे ठिकाण मुंबईपासून सुमारे 375 किमी अंतरावर आहे. तर पुण्याहून भोर घाटमार्गे सुमारे 288 किलोमीटर अंतरावर आहे.

Top 10 Famous Tourist Spots on Konkan Coast


6) रत्नागिरी


                                  रत्नागिरी हे अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर वसलेले भारतातील एक प्रमुख बंदर आहे. कोकणात सात महत्त्वाचे दीपगृह आहेत. त्यापैकी एक दीपगृह येथे आहे. मित्रांनो रत्नागिरी जिल्हा हापूस आंबा, काजू ,नारळ आणि भात इत्यादीसाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्यस्थळ म्हणूनही ओळखले जाते. एवढेच नाही तर रत्नागिरी ही परशुराम, वरदमुनी यांची भूमी म्हणूनही ओळखली जाते. या ठिकाणाला भेट देण्यासाठी हिवाळ्यात अनुकूल हवामान असते . त्यामुळे ऑक्टोबर ते मार्च हे महिने सर्वोत्तम मानले जातात. येथील लोक नमन ,दशावतार, झाकरी,फुगडी, शक्ती तुरा आणि गवळण यासारखे कोकणी संस्कृतीशी संबंधित लोकनृत्य सादर करतात. मित्रांनो पर्यटनासाठी रत्नागिरीमध्ये आल्यास आपण टिळक स्मारक ,थिबा पॅलेस ,रत्नदुर्ग किल्ला, दीपस्तंभ, भगवती मंदिर, भाटे बीच आणि मांडवी बीच अशा अनेक पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता. रत्नागिरीमध्ये आल्यानंतर सी फूडचा आस्वाद घ्यायचा असेल तर मांडवी बीचला आवर्जून भेट द्या. येथे तुम्हाला सी फूड बरोबरच रिच करी ,कोकम करी ,कोंबडी वडे ,चिकन, आंबोळी, सांदण आणि मावणी मटन अशा अनेक स्थानिक खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेता येईल.

Top 10 Famous Tourist Spots on Konkan Coast



7 ) देवबाग 


                                   देवबाग हे महाराष्ट्रातील मालवणच्या नयनरम्य किनाऱ्यावर वसलेले एक छुपे रत्न म्हणायला काही हरकत नाही.हे निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव देणारे ठिकाण आहे.हा सुंदर आणि नयनरम्य बीच तारकर्ली बीचला लागूनच आहे . येथे तुम्हाला कर्ली नदी व अरबी समुद्राच्या पाण्याचा संगम देखील पाहायला मिळतो . संगमानंतर या ठिकाणाला मोबर पॉइंट या नावाने ओळखले जाते . इथली पांढरीशुभ्र वाळू आणि स्वच्छ निळे पाणी नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत आले आहे. या बीचवर तुम्हाला सीगल पक्ष्यांचे थवे बघण्याचा आनंद घेता येईल. एवढेच नाही तर तुम्ही या ठिकाणी वॉटर स्कूटर , स्कुबा डायव्हिंग , जेट स्किइंग, बंपर राईड, डॉल्फिन बोट राईड, स्काय बोटिंग, पॅरासेलिंग अशा अनेक प्रकारच्या वॉटर स्पोर्टचा आनंद घेऊ शकता. या बीचवर संध्याकाळी सनसेट पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात. येथे नैसर्गिक सौंदर्य तर आहेच ,परंतु त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही येथे अस्सल मालवणी पाककृतीचा आस्वाद घेऊ शकता. येथून जवळच असलेल्या त्सुनामी बेटाला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता .

Top 10 Famous Tourist Spots on Konkan Coast


8 ) वेंगुर्ला


                                     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारी वसलेल्या या शहराला संपन्न अशी परंपरा लाभलेली आहे. पूर्वी हे शहर एक व्यापारी बंदर म्हणून ओळखले जायचे. परंतु आता हे शहर एक मासेमारी बंदर आणि पर्यटनामुळे प्रसिद्धीस आले आहे. कमी प्रदूषित समुद्रकिनाऱ्यांमध्ये या ठिकाणाची आता गणना केली जात आहे. या ठिकाणी कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृह पैकी एक दीपगृह पाहायला मिळते. अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेले हे शहर वेगाने विकसित होणारे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जात आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्करआणि कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे हे जन्मगाव . आपण जर वेंगुर्ला टूरवर असाल तर वेंगुर्ला बीच ,वेंगुर्ला जेट्टी, वेंगुर्ला लाईट हाऊस, शिरोडा बीच, मोचेमाड बीच, सागरेश्वर बीच ,कोंडुरा बीच ,खवणे बीच अशा अनेक पर्यटन स्थळांना भेट देऊन मनसोक्त आनंद घेऊ शकता. जर तुम्ही वेंगुर्ला बीचवर असाल तर या ठिकाणी तुम्हाला अनेक मच्छीमार त्यांच्या वस्तू विकत असतानाच दृश्य पाहायला मिळतं. एवढेच नव्हे तर वेंगुर्ला येथे तुम्ही खडकावर बसून थंड वाऱ्याचा आनंद घेत मासेमारी करतानाचे दृश्य पाहू शकता . येथून दीपगृहाच्या पायऱ्या जवळच असल्यामुळे तुम्ही दीपगृहाला सुद्धा भेट देऊ शकता. त्याचबरोबर वायंगणी हा बीच पांढऱ्या वाळूचा आणि सौम्य उतार असलेला सुंदर असा बीच आहे. तुम्हाला जर पाण्यात खेळायचे असेल तर या ठिकाणाला आवर्जून भेट द्या. येथे कमी पर्यटक भेट देत असल्यामुळे शांतपणे आनंद लुटता येतो. परंतु उतार असल्यामुळे पर्यटकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या पर्यटनस्थळांचा आनंद घेतल्यानंतर काजू आणि काजूपासून बनवलेल्या पदार्थांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. त्यामुळे काजूपासून बनवलेल्या विविध पदार्थांचा आस्वाद घ्यायला विसरू नका.

Top 10 Famous Tourist Spots on Konkan Coast



9 ) तारकर्ली


                                   तारकर्ली हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक प्रसिद्ध बीच आहे. हा बीच कोकणातील क्वीन बीच म्हणून ओळखला जातो.त्यामुळे परदेशी पर्यटकांचे हे आवडते ठिकाण बनले आहे . हा बीच मालवणच्या दक्षिणेस कर्ली नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर स्थित आहे . पांढरी शुभ्र वाळू आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी हा बीच खूपच प्रसिद्ध आहे . हा बीच त्याचे प्राचीन सौन्दर्य अजूनही टिकवून आहे . येथील पांढरी वाळू ,स्वच्छ निळे पाणी आणि सुरूची झाडे या बीचची शोभा वाढवतात . बीचवरील बांबूची आणि सुपारीची झाडे पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते .येथे तुम्हाला अधूनमधून डॉल्फिन व कासवांचे दर्शन होते .येथे संध्याकाळी सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी पाहायला मिळते . संध्याकाळच्या पसरलेल्या प्रकाशात या बीचचे सौन्दर्य अधिकच खुलून दिसते . या ठिकाणाला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी सर्वोत्तम मानला जातो .

Top 10 Famous Tourist Spots on Konkan Coast


10 ) मालवण

मालवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असून सिंधुदुर्ग किल्ला आणि मालवणी पदार्थांसाठी खूपच लोकप्रिय आहे . मालवण हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वांत प्रसिद्ध व श्रीमंत तालुका समजला जातो . या ठिकाणाच्या पूर्वेला पश्चिम घाट तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे . मालवणमधील समुद्र किनारे असोत किंवा घनदाट जंगले असोत येथे येणाऱ्या पर्यटकांना खिळवून ठेवण्याची क्षमता मात्र त्यांच्यामध्ये नक्की आहे . येथील पर्यटन स्थलांबद्दल बोलायचे झाल्यास येथे सिंधुदुर्ग किल्ला ,रामेश्वर मंदिर ,वागेश्वर मंदिर ,विजय दुर्ग ,शिवसमुद्र संग्रहालय ,कुणकेश्वर मंदिर आणि बीच ,सागरी वन्यजीव अभयारण्य ,महापुरुष मंदिर ,नवदुर्गा मंदिर , देवबाग बीच आणि त्सुनामी बेट अशा एका पेक्षा एक सरस आणि पर्यटकांना आकर्षित करणा-या पर्यंटनस्थळांना तुम्ही भेट देऊ शकता . तुम्ही जर मालवणच्या टुरवरअसाल आणि तुम्हाला जर सिफूडचा आस्वाद घ्यायचा असेल तर मालवणी तिकला , कोलंबीचे सार , खेकड्याचा मसाला ,भाजलेले पापलेट , बांगड्याचे सार ,सुरमईचे सुके असे अनेक प्रकारचे सिफूड मालवणी पद्धतीने बनविलेले उपलब्ध असते .येथील मालवणी मसालेही प्रसिद्ध आहेत . त्याचबरोबर विविध प्रकारचे जाम , आमरस,आंबापोळी , फणसपोळी ,काजुगर ,आंबावडी , कोकम सरबत ,तळलेले फणसाचे गरे आणि मालवणी खाजा अशा अनेक प्रकारच्या स्थानिक खाद्य पदार्थांचाही आस्वाद घ्यायला विसरू नका .


हे सुद्धा वाचा : पाली - सुधागड तालुक्यातील प्राचीन स्थळे