Pages

Thursday, 5 June 2025

श्रीवर्धन बीच - कोकणातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ

 


श्रीवर्धन बीच - कोकणातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ


श्रीवर्धन बीच कोकण - निसर्गरम्य  आणि लोकप्रिय समुद्रकिनारा


                         कोकण म्हणजे  निसर्ग सौंदर्य ,निळाशार समुद्र किनारा ,हिरव्यागार सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि पारंपरिक संस्कृती यांचं अद्वितीय मिश्रण असलेलं भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक अत्यंत सुंदर किनारपट्टीवरील प्रदेश आहे . श्रीवर्धन हे निसर्गरम्य कोकणातील एक सुंदर ,शांत आणि ऐतिहासिक ठिकाण आहे . हे कोकणातील अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी लोकप्रिय आणि मनाला भिडणारं पर्यटन स्थळ मानलं जात.हे केवळ त्याच्या स्वच्छ आणि नितळ समुद्रकिनाऱ्यांसाठीच नाही तर येथील महत्त्वपूर्ण मंदिरे आणि धार्मिक ठिकाणांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे .

                         या लेखात आपण श्रीवर्धनचा इतिहास ,नैसर्गिक सौंदर्य ,काय पाहावं ,काय खावं आणि कधी जावं याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत .

श्रीवर्धन-कोकणाच शांत रत्न

                           श्रीवर्धन हे रायगड जिल्ह्यातील एक प्राचीन बंदर असून ऐतिहासिक दृष्टीकोनातून महत्वाचे ठिकाण आहे . तसेच ते ऐतिहासिक काळातील एक व्यापारी ठिकाण होते . हे ठिकाण 16-17 व्या शतकात अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात होते . नंतर ते विजापूरच्या आदिलशाहाच्या ताब्यात होते . त्यानंतर हे ठिकाण जंजिऱ्याच्या सिद्दीच्या ताब्यात होते . पहिले पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचे हे जन्मगाव आहे . पर्यटकांच्या दृष्टीने श्रीवर्धनचे मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे येथील स्वच्छ ,निर्मळ आणि शांत समुद्र किनारा.


श्रीवर्धन बीच


श्रीवर्धन बीच कुठे आहे ?


                          श्रीवर्धन बीच हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात आहे . हे ठिकाण मुंबईपासून सुमारे 173 किमी अंतरावर तर पुण्याहून ताम्हिणी घाटमार्गे साधारणत: 161 किमी अंतरावर आहे . अरबी समुद्राच्या किनारी वसलेला आणि कोकण किनारपट्टीवरील एक शांत ,अत्यंत निसर्गरम्य बीच आहे . पावसाळ्यात व हिवाळ्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवळ पसरलेली असते . डोंगरदऱ्यांमधून जातानाचा प्रवास एक सुंदर अनुभव असतो .


श्रीवर्धन बीचचं सौंदर्य

                         श्रीवर्धन बीच बद्दल सांगायचे झाल्यास हा 3 किमी लांबीचा बीच असून तो सुरक्षित बीचमध्ये गणला जातो . येथे मऊशार वाळूवर चालण्याचा अनुभव अप्रतिम असतो . पश्चिमेकडून येणारा भन्नाट वारा अंगावर घेत किनाऱ्यावर केलेला वॉक म्हणजेच एक सुखद अनुभवच. सूर्यास्त बघण्यासाठी हे ठिकाण खूप छान आहे. येथील सुरुची बने आणि शांततापूर्ण वातावरण मनाला प्रसन्न करून टाकते. येथील रोठा सुपारी खूपच प्रसिद्ध आहे. संपूर्ण गावात पसरलेल्या नारळ पोफळीच्या बागा हे या ठिकाणाचं खास वैशिष्ट्य आहे. हे ठिकाण मुख्यतः मासळी, नारळ,सुपारी, फणस व काजू यासाठी प्रसिद्ध आहे.


श्रीवर्धन बीच - कोकणातील एक प्रसिद्ध आणि सुंदर समुद्रकिनारा



काय कराल श्रीवर्धनमध्ये ?

1 ) बीचवर फेरफटका :

                             श्रीवर्धनमध्ये आल्याननंतर शांत आणि निवांत वेळ घालवायचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे बीचवर फेरफटका . येथे तुम्ही वॉक करू शकता , वाचन करू शकता ,योगा करू शकता आणि लाटांच्या आवाजात स्वत: ला विसरून जाता येतं. तसेच येथे सी फूडचा आनंदही घेता येतो .

2 ) बोटिंग आणि वॉटर स्पोर्ट्स :

                          या बीचवर विविध प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्सचा जसे की , जेट स्की राइड , बंपर राइड ,बनाना राइड आनंद घेता येतो . त्यामुळे अॅ ड व्हेंचर प्रेमींसाठी हे ठिकाण चांगला पर्याय आहे .

3 ) स्थानिक बाजार :

                      श्रीवर्धनच्या स्थानिक बाजारपेठेत विविध प्रकारचे स्थानिक खाद्य पदार्थ ,मासे , कोकम ,कैरीचे पदार्थ , मालवणी मसाले आणि रोठा सुपारी इत्यादी वस्तूंना भरभरून मागणी असते .

श्रीवर्धन बीच जवळची इतर ठिकाणे

1 ) हरिहरेश्वर ( 21 किमी ) :

                       श्रीवर्धन बीचपासून अवघ्या 15 किमी अंतरावर असलेले हरिहरेश्वर हे एक प्रसिद्ध धार्मिक ठिकाण आहे . या ठिकाणाला 'दक्षिण काशी' म्हणूनही संबोधले जाते . येथील प्राचीन शिवमंदिर आणि स्वच्छ ,शांत समुद्रकिनारा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत आला आहे . समुद्र ,डोंगर आणि धार्मिक वातावरण यांचा संगम असलेले हे ठिकाण आहे .

2 ) दिवेआगर (19 किमी ) :

                          हे ठिकाण श्रीवर्धन बीचपासून 20 किमी अंतरावर आहे . दिवेआगर हे गाव स्वच्छ आणि विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे . येथे नारळी- पोफळीच्या बागा सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात .येथील सुवर्ण गणेश मंदिर हे दिवेआगरचे प्रमुख आकर्षण आहे . येथे पर्यटकांसाठी समुद्रकिनाऱ्यावर चालणे आणि कोकणी जीवनशैलीचा आनंद घेता येतो . तसेच विविध वॉटर स्पोर्ट्सचाही मनसोक्त आनंद घेता येतो . येथील जेवण विशेषत : सीफूड जे स्थानिक कोकणी पद्धतीने बनवलेले ते पर्यटकांना खूप आवडते . कौटुंबिक सहलीसाठी हे ठिकाण उत्तम पर्याय आहे.

3 ) वेळास ( 26  किमी ) :

                       वेळास हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक शांत आणि निसर्गरम्य कोकणी गाव आहे . श्रीवर्धनवरून बागमंडला मार्गे येथे पोहोचता येते .येथील समुद्र किनारा शांत आणि स्वच्छ आहे . येथे पर्यटकांची फारशी गर्दी नसते . हे ठिकाण कासव संवर्धनासाठी ओळखलं जातं . प्रत्येक हिवाळ्यात ऑलिव्ह रिडली (Olive Ridley) कासवांची पिल्लं अंड्यातून बाहेर पडून समुद्राच्या दिशेने जाताना पाहण्याचा आनंददायी अनुभव पर्यटक घेतात . दरवर्षी येथे कासव महोत्सव आयोजित केला जातो ,त्यामुळे या कालावधीत पर्यटक या ठिकाणी गर्दी करत असतात.


Shrivardhan Beach


श्रीवर्धनमधील खाद्यसंस्कृती 

श्रीवर्धनमध्ये पारंपरिक कोकणी पद्धतीचे जेवण प्रसिद्ध आहे त्याचा तुम्हाला आस्वाद घेता येईल . सीफूड खाणाऱ्यांसाठी हे ठिकाण एक पर्वणीच आहे .

खास पदार्थ :

बांगडा फ्राय

सुरमई फ्राय व कालवण

नारळ पोळी

आंबा पोळी

सोलकढी

कोकम सरबत

राहण्याची सोय 

                       रिसॉर्ट्स ,होमस्टे आणि गेस्ट हाऊसेस येथे राहण्याची सोय होऊ शकते . समुद्रकिनाऱ्याजवळ राहिल्याने सकाळी लाटांचा आवाज आणि समुद्राची साद ऐकत उठणं हा एक वेगळा अनुभव असतो .

कधी जाल श्रीवर्धनला ?

सर्वोत्तम वेळ : ऑक्टोबर ते मार्च

पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो त्यामुळे बीचवरील वॉटरस्पोर्ट्स मर्यादित असतात .

कसे पोहोचाल ?

गाडीने :

मुंबईहून मुंबई - गोवा महामार्ग (NH66) मार्गे - पनवेल - नागोठणे -माणगाव - श्रीवर्धन

पुण्याहून - ताम्हिणी घाट / वरंध घाट मार्गे श्रीवर्धन

रेल्वेने :

जवळचे स्थानक - माणगाव . तिथून पुढे बस / खासगी वाहन करून श्रीवर्धनला येता येते .

बसने :

एस . टी . बसेस श्रीवर्धनसाठी नियमितपणे असतात .


श्रीवर्धन बीच - कोकणातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ


का यावं श्रीवर्धनला ?

                       श्रीवर्धनमध्ये तुम्हाला शांतता , निसर्ग , इतिहास आणि कोकणी आत्मीयता या सगळ्यांचे सुंदर मिलन पाहायला मिळते . तुम्ही जर शहराच्या गर्दीतून आणि धावपळीतून दूर जावून स्वत: शी संवाद साधण्याचा विचार करत असाल , तर श्रीवर्धन हे ठिकाण एकदा तरी बघायला हवं.

निष्कर्ष :

                     कोकणाच्या कुशीत वसलेलं श्रीवर्धन बीच म्हणजे कोकणातलं एक शांत आणि रमणीय ठिकाण आहे . दरवर्षी इथे हजारो पर्यटक येतात ,तरी सुद्धा इथली शांतता अबाधित राहिलेली आहे . जर तुम्ही विकेंड प्लॅनिंग करत असाल ,तर श्रीवर्धनचा नक्की विचार करा . एकदा आलात की पुन्हा पुन्हा यावंसं वाटेल - हे नक्की !

तुम्ही श्रीवर्धनाला कधी गेलात का ? गेला असाल तर तुमचा अनुभव कसा होता ? हे खाली कमेंट्स करून नक्की कळवा .

No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही . तसेच कोणत्याही शासनाशी संबंधित नाही . कृपया ही official वेबसाइट मानू नका आणि खाली कमेंटमध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका . आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारींवर लक्ष्य देऊ शकत नाही . आम्ही आमच्या सर्व अभ्यंगताना संबंधित तक्रारी ,योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो . धन्यवाद !